लॉरेन्सच्या तोडीला तोड म्हणून फ्रेंचांनी ब्रेमॉनी हा जो फ्रेंच अधिकारी मोठ्या सैन्यानिशी आणि साधनसामग्रीसह पाठविला होता, तो लॉरेन्सपेक्षा अधिक शिकलेला, अरबी भाषेवर जास्त प्रभुत्व असलेला असा होता, परंतु जे लॉरेन्सला जमले, ते त्याला जमले नाही. लॉरेन्सला युद्धाविषयी फार जुजबी माहिती होती आणि युद्धातील डावपेचातही तो कच्चा होता, असे म्हटले जात होते, परंतु अशा प्रकारच्या सर्वमान्य युद्धांत तो कधी उतरलाच नाही. तो शिवाजी महाराजांच्या पद्धतीने गनिमी काव्याचे युद्ध खेळत राहिला आणि म्हणूनच त्याचा विजय झाला. दुसरे म्हणजे माणसे पारखून त्यांना जोडण्याची आणि त्यांच्यात भावनेने गुंतण्याची आणि त्यांना आपल्यात गुंतविण्याची लॉरेन्सची हातोटी मनस्वी होती.
हिटलरचे गुन्हे अक्षम्य असले, तरी ऐतिहासिकदृष्ट्या इंग्रजांच्या जग व्यापून टाकणाऱ्या वसाहतवादाला त्याने खीळ घातली, हे निर्विवाद आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाले ते दुसऱ्या महायुद्धामुळे, छिन्न झालेल्या ब्रिटिश एंपायरला भारत सोडण्याशिवाय इलाज नव्हता म्हणून! आणि हा आशियातील वसाहतवाद ब्रिटिशांनी युद्धानंतर सोडण्याच्या वचनावरच अमेरिका ब्रिटनला युद्धात सहकार्य करायला तयार झाली, असेही म्हणतात.
जागतिक जनमताचा प्रचंड दबाव ब्रिटिश साम्राज्यशाहीवर पडला होता. तसे पाहिले तर हिटलरच्या अतिरेकी युद्धधोरणाचा फायदा भारत स्वतंत्र होण्यासाठी झाला. सत्याग्रहामुळे स्वातंत्र्य मिळाले असते, तर भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे जनक महात्मा गांधींनी आपली सत्याग्रही चळवळ ज्या दक्षिण आफ्रिकेतून सुरू केली, ती दक्षिण आफ्रिका स्वतंत्र व्हायला १९९५ साल उजाडावे लागले नसते.
दक्षिण आफ्रिकेतील सोन्याचे साठे संपेपर्यंत गोरासाहेब तेथून ढिम्म हलला नाही. भारतीय उपखंड सोडण्याचे वचन अमेरिकेला दिल्याने मात्र साहेबाला भारत सोडावा लागला.
युरोपियांनी साहसी लॉरेन्ससारख्या अनेक संपत्ती-शोधक व समाज विस्तारू शकणाऱ्यांना जगभर पाठविले आणि त्यातूनच शेवटी सार्वभौम सत्ता ब्रिटिशांनी हस्तगत केली. चीन, बर्मा, भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा येथील सूर्य न मावळणाऱ्या वसाहतवादाला अरबस्तानातील तेलाची देणगी त्या काळीच मिळाली असती, तर जगाचा इतिहास किती बदलला असता किंवा त्यामुळे कदाचित हिटलरचा उदय झाला नसता, तर काय झाले असते या सगळ्या जर-तरच्या गोष्टी आहेत.
लॉरेन्सचे आयुष्य आणि लिखाण यांनी युद्धशास्त्राला आणि युद्धविषयक साहित्याला एक वेगळे महत्त्व प्राप्त करून दिले हे मात्र निश्चित! पुढील शेवटच्या लेखात ओसामाच्या विचारसरणीतील आणि लॉरेन्सच्या स्वप्नातील साम्य शोधण्याचा प्रयत्न करू! ओसामाच्या आजच्या विचारात लॉरेन्सच्या संयुक्त अरब संघटनांचे स्वप्न दडलेले आहे. लॉरेन्सच्या काळी अरबांकडे आजच्यासारखे अनाब-शनाब पैसे नव्हते, राजमहाल, शहरे नव्हती, शस्त्रास्त्रे नव्हती, शिक्षणही नव्हते. आता पैशाचा जोर आणि इस्लामी भावनेला हाताशी धरून ओसामा लॉरेन्सचे स्वप्न प्रत्यक्षात उतरू पाहातो आहे.
लॉरेन्सच्या म्हणण्यानुसार तेव्हाच अरबांचे एकीकरण झाले असते, तर त्यानंतर वाळवंटातील खूनखराबा जो आजपर्यंत चालू आहे तो झाला नसता!
- जयराज साळगावकर