मुंबई >> बातम्या RSS

नव्या समाजाच्या निर्मिती वृत्तपत्राच्या माध्यमातूनच शक्‍य - राष्ट्रवादीचे नेते अरुण गुजराथी
सकाळ वृत्तसेवा
Sunday, June 07th, 2009 AT 10:06 PM
कल्याण - पत्रकारितेच्या आंदोलनातील शक्ती फार मोठी आहे. समाजअभिसरणाची आणि परिवर्तनाची शक्ती वर्तमानपत्रांमध्ये आहे. समाजात नीतिमत्ता आणि जागरुकता वाढविण्याचे काम वृत्तपत्रे करतात. नव्या समाजाची निर्मिती वृत्तपत्रांच्या माध्यमातून शक्‍य आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अरुण गुजराथी यांनी येथे केले.

साप्ताहिक 'कल्याण नागरिक'च्या हीरक महोत्सवाचा प्रारंभ गुजराथी यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर, सुधीर जोगळेकर, आमदार संजय केळकर, हीरक महोत्सव समितीचे अध्यक्ष नारायण मराठे, कल्याण नागरिकचे आत्माराम जोशी, इला रवाणी आणि हेमल रवाणी उपस्थित होते. यानिमित्ताने काढण्यात आलेल्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.

या वेळी कल्याणचे भूषण समजले जाणारे साहित्यिक वि. आ. बुवा, शिल्पकार भाऊ साठे, ज्येष्ठ पत्रकार विनायक बेटावकर यांच्यासह निशा मोराईस, दिलीप सूचक, सुहास लेले, अशोक दुगाडे आणि श्रीकांत शेट्टी यांचा सत्कार करण्यात आला.

गुजराथी यांनी सांगितले, की पद गेले तरी चालेल, पण पत जाता कामा नये. समाजात अहंकार वाढीस लागला आहे. अहंकार वाढीस लागला की माणसाचे जीवन संपते. समाजात जे चांगले घडते, त्याचेही कौतुक होणे गरजेचे आहे. मिशन मागे पडून कमिशन मिळविण्याची वृत्ती समाजात वाढीस लागली आहे. ही बाब निकोप समाजाच्या निर्मितीसाठी घातक आहे. 'डॉलर इज गॉड' ही नवी संस्कृती मूळ धरतेय, तिला वेळीच रोखले पाहिजे. समाजातील सगळ्या वाईट गोष्टीवर भाष्य करण्याची ताकद पत्रकारांकडे असते. त्यातून समाजपरिवर्तन व्हावे हा त्यांचा उदात्त हेतू असतो; मात्र हा हेतू काही अंशी मागे पडत चालला असला, तरी समाज घडविणारी पत्रकारिता करणारे चांगले लोक पत्रकारितेत आजही आहेत असे नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीराम केळकर यांनी केले.

कायद्यापुढे कुणीही मोठा नाही

खासदार पद्मसिंह पाटील यांना पवनराजे निंबाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून अटक झाल्याविषयी गुजराथी यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले, की पाटील हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत. गेल्या 25 वर्षांपासून त्यांच्याशी माझा परिचय आहे. सीबीआयने त्यांना अटक केल्यानंतर सीबीआयच्या चौकशीला सहकार्य करण्याचे पाटील यांनी यापूर्वीच मान्य केले आहे. शेवटी कायद्यापुढे कोणीही मोठा नाही. सीबीआयची चौकशी ही कायद्याचा एक भाग आहे. कायद्याला आमचा पक्ष आव्हान देऊ शकत नाहीच. चौकशीअंती काय खरे आणि काय खोटे हे समोर येणार आहेच, असे सांगून अधिक भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला.

वाचकांच्या प्रतिक्रिया