वाशीम - साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक नामदेव कांबळे उपाख्य "ना.चं.' यांचे "शब्दांच्या गावा जावे' हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. नागपूरच्या "ऋचा प्रकाशना'ने ते प्रकाशित केले आहे.
साहित्यिक कांबळे यांचे हे 16 वे प्रकाशित पुस्तक असून, आजवर त्यांच्या सात कादंबऱ्या, चार कवितासंग्रह, कथासंग्रह, एक ललित लेखसंग्रह, एक चरित्र, एक समीक्षा ग्रंथ अशी 15 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या पुस्तकांना साहित्य अकादमी पुरस्कारासह अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. श्री. कांबळे यांचे "शब्दांच्या गावा जावे' हे पुस्तक त्यांच्या निवडक भाषणांचे संकलन आहे. त्यात 14 भाषणांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. सम्राट अकबर, शिवाजी राजांचा गनिमीकावा, तुकाराम महाराजांचे सामाजिक कार्य, डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा समाजकारण व राजकारणावरील प्रभाव, स्त्री : दशा आणि दिशा, साहित्यिक आणि समाज, कागदा पलीकडचे, शब्दांच्या गावा जावे, वाचन संस्कार, केल्याने होत आहे रे, "हम भी कुछ देना सिखे', ओबीसींना आरक्षण हवेच, मातंग समाजाचे धर्मांतर : दुराग्रह व अज्ञान, आणि शेतकरी आत्महत्या : शोध आणि बोध, अशा सर्व जिव्हाळ्याच्या विषयांवरचे त्यांचे "शब्दाच्या गावा जावे'मधील भाष्य वाचनीय आहे. हे पुस्तक लवकरच विदर्भातील प्रमुख पुस्तकालयांमध्ये आणि सार्वजनिक वाचनालयांमध्ये वाचकांना उपलब्ध होईल, असे "ना.चं.'नी सांगितले.
'अस्पर्श' ते 'शब्दांच्या गावा जावे'!
'ना.चं.'ची आजवर 15 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या "अस्पर्श' नावाच्या पहिल्या कादंबरीचे प्रकाशन सन 1990 मध्ये सुप्रसिद्ध वऱ्हाडी कवी विठ्ठल वाघ यांच्या हस्ते वाशीममधील कवी राजशेखर मंचावर झाले होते. त्यांच्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी वाशीमकरांनी नागरी समिती स्थापन करून निधी गोळा केला होता. साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेल्या "राघववेळ' या कादंबरीचे प्रकाशन पुण्यात डॉ. भालचंद्र फडके यांच्या हस्ते झाले होते. त्यावेळी दया पवार, अर्जुन डांगळे, अनुराधा पाध्ये आदी मंडळी हजर होती.